Sunday 13 December 2015

अवस्थात्रयाने...


अवस्थात्रयाने । रूजतो वरती
विस्तारे खालती । विश्वाकार

विश्व-संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा देऊन त्याची निर्मिती आणि विस्तार कसा होतो याचे सविस्तर वर्णन केले आहे...
ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे । अधोर्ध्व सूचित मूळें । बळिया बांधोनि आळें । मायायोगाचे ॥
मग आधिली सदेहांतरे । उठती जिये अपारे । तें चौपासि घेऊनि आगारे । खोलावती ॥
ऐसे भवद्रुमाचें मूळ । हें ऊर्ध्वीं करी बळ । मग आणियांचें बेंचळ । अधीं दावी ॥ ९१,९२,९३/१५
ब्रह्मतत्त्व आणि माया यांच्या दृढ संबंधांचे आळे तयार होऊन त्यात या वृक्षाची निर्मिती होते. असंख्य देहरूपी अंकूर फुटून त्याचा अपार विस्तार होतो. अशा या संसारवृक्षाचे मूळ (माया) ते वरच्या बाजूस म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी रुजले की फांद्यांचा विस्तार सतत वाढत राहातो...

Tuesday 8 December 2015

ऐल ओलांडुनी


ऐल ओलांडुनी । क्षितिजी पोचला
ऐल पैल झाला । एकाकार..!
एका ईश्वराखेरीज कोणताही विचार नाही अशी अव्यभिचारी उपासना करणारा भक्त त्रिगुणातीत अशा ब्रम्हत्वाशी पोचतो... हे समजावताना दिलेल्या उपमा-

जैसा सैंधवाचा रवा । सिंधूमाजीं पडावा । विरालेया विरवावा । हेंही ठाके ॥ ३९३/१४
नातरी जाळूनि तृण । वन्हिही विझे आपण । तैसे भेदु नाशूनि जाण । ज्ञान नुरे ॥ ३९४/१४
माझे पैलपण जाये । भक्त हे ऐलपण ठाये । अनादि ऐक्य जे आहे । तेंचि निवडे ॥ ३९५/१४

मीठ समुद्राच्या पाण्यात पडले तर ते असे एकरूप होते की मीठ तर वेगळे राहातच नाही पण ते विरघळले हेही उरत नाही. गवत जाळून मग अग्नीही विझतो तसे वेगळेपण नाहीसे करून ज्ञानही त्या ऐक्यात विलीन होते तेव्हा भक्त आणि ईश्वर यांच्यातील ऐल-पैलपण विरून सर्व एकाकार होते..!

Tuesday 1 December 2015

अनेकधा झाले..


अनेकधा झाले । प्रतिबिंब जळी
वरून न्याहाळी । कल्लोळांना..!

त्रिगुणांच्या आधीन असलेला देह त्यांच्या प्रेरणांनुसार वर्तन करत असतो. ज्यावेळी ‘पुरुष’ द्रष्टा होऊन हे पाहतो तेव्हा तो गुणातीत स्व-रूप जाणू शकतो.. हे सांगताना दिलेली उपमा-

नातरी आपण जळी । बिंबलो तिरोनी न्याहाळी । चळण होता कल्लोळी । अनेकधा ॥ २८९/१४
तैसे गुणीं गुणापरौतें । जें आपणपें असे आयितें । तिये अहं बैसे अहंते । मूळकेचिये ॥ २९२/१४
तैं तेथुनि मग पाहता । म्हणे साक्षी मी अकर्ता । हे गुणचि क्रियाजातां । नियोजना ॥ २९३/१४

काठावरून पाहिले असता आपले प्रतिबिंब तरंगांमुळे विस्कटून गेलेले दिसते पण काठावरून अलिप्तपणे पाहिले असता बिंब आपल्या जागी स्थिर आहे हे लक्षात येते तसे त्रिगुणांमुळे स्व-रूप अनेकविध रूपात वर्तताना दिसत असले तरी ज्ञानी माणसाला सत् रूप स्थिर असते हे कळलेले असते.