आकाश वर्षते ।
डबकी बिंबते
तदाकार होते ।
असीम जे..!
कर्मं अखंड घडत असतात. कृष्ण त्यांची
कारणं अर्जुनाला समजावून सांगत आहे. पहिलं कारण देह. दुसरं जीव. जीवाचं स्वरूप समजून
देताना ही उपमा दिलेली आहे.
आणि कर्ता ते दुजें । कर्माचें कारण
जाणिजे । प्रतिबिंब म्हणिजे । चैतन्याचें जें ॥ ३२१/१८
‘आकाशचि वर्षे
नीर । तें तळवटीं बांधे नाडर । मग बिंबोनि तदाकार । होय जेवीं ॥ ३२२/१८’
तैसें आपुलेनि विसरें । चैतन्यचि
देहाकारें । आभासोनी आविष्कारे । देहपणें जें ॥ ३२४/१८
जया विचाराचां देशीं । प्रसिद्धी गा
जीवु ऐसी । जेणें भाक केली देहेंसीं । आघवाविषयी ॥ ३२५/१८
आकाश पर्जन्याचा वर्षाव करतं. त्याचं
पृथ्वीवर डबकं तयार होतं. आणि असीम असलेलं आकाश डबक्याच्या आकाराचं होतं. तसे
चैतन्य देहाकार धारण करून कर्मरूपात व्यक्त होत राहातं. आणि ‘स्व’रूपाचा विसर पडून
‘मी देह आहे’ असं मानू लागतं. अशी विपरित समजूत करून घेतलेले चैतन्य म्हणजे जीव.
या जीवाने अवघी कर्मे करण्याबाबत देहाशी करार केलेला आहे..!