Sunday, 13 December 2015

अवस्थात्रयाने...


अवस्थात्रयाने । रूजतो वरती
विस्तारे खालती । विश्वाकार

विश्व-संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा देऊन त्याची निर्मिती आणि विस्तार कसा होतो याचे सविस्तर वर्णन केले आहे...
ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे । अधोर्ध्व सूचित मूळें । बळिया बांधोनि आळें । मायायोगाचे ॥
मग आधिली सदेहांतरे । उठती जिये अपारे । तें चौपासि घेऊनि आगारे । खोलावती ॥
ऐसे भवद्रुमाचें मूळ । हें ऊर्ध्वीं करी बळ । मग आणियांचें बेंचळ । अधीं दावी ॥ ९१,९२,९३/१५
ब्रह्मतत्त्व आणि माया यांच्या दृढ संबंधांचे आळे तयार होऊन त्यात या वृक्षाची निर्मिती होते. असंख्य देहरूपी अंकूर फुटून त्याचा अपार विस्तार होतो. अशा या संसारवृक्षाचे मूळ (माया) ते वरच्या बाजूस म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी रुजले की फांद्यांचा विस्तार सतत वाढत राहातो...

Tuesday, 8 December 2015

ऐल ओलांडुनी


ऐल ओलांडुनी । क्षितिजी पोचला
ऐल पैल झाला । एकाकार..!
एका ईश्वराखेरीज कोणताही विचार नाही अशी अव्यभिचारी उपासना करणारा भक्त त्रिगुणातीत अशा ब्रम्हत्वाशी पोचतो... हे समजावताना दिलेल्या उपमा-

जैसा सैंधवाचा रवा । सिंधूमाजीं पडावा । विरालेया विरवावा । हेंही ठाके ॥ ३९३/१४
नातरी जाळूनि तृण । वन्हिही विझे आपण । तैसे भेदु नाशूनि जाण । ज्ञान नुरे ॥ ३९४/१४
माझे पैलपण जाये । भक्त हे ऐलपण ठाये । अनादि ऐक्य जे आहे । तेंचि निवडे ॥ ३९५/१४

मीठ समुद्राच्या पाण्यात पडले तर ते असे एकरूप होते की मीठ तर वेगळे राहातच नाही पण ते विरघळले हेही उरत नाही. गवत जाळून मग अग्नीही विझतो तसे वेगळेपण नाहीसे करून ज्ञानही त्या ऐक्यात विलीन होते तेव्हा भक्त आणि ईश्वर यांच्यातील ऐल-पैलपण विरून सर्व एकाकार होते..!

Tuesday, 1 December 2015

अनेकधा झाले..


अनेकधा झाले । प्रतिबिंब जळी
वरून न्याहाळी । कल्लोळांना..!

त्रिगुणांच्या आधीन असलेला देह त्यांच्या प्रेरणांनुसार वर्तन करत असतो. ज्यावेळी ‘पुरुष’ द्रष्टा होऊन हे पाहतो तेव्हा तो गुणातीत स्व-रूप जाणू शकतो.. हे सांगताना दिलेली उपमा-

नातरी आपण जळी । बिंबलो तिरोनी न्याहाळी । चळण होता कल्लोळी । अनेकधा ॥ २८९/१४
तैसे गुणीं गुणापरौतें । जें आपणपें असे आयितें । तिये अहं बैसे अहंते । मूळकेचिये ॥ २९२/१४
तैं तेथुनि मग पाहता । म्हणे साक्षी मी अकर्ता । हे गुणचि क्रियाजातां । नियोजना ॥ २९३/१४

काठावरून पाहिले असता आपले प्रतिबिंब तरंगांमुळे विस्कटून गेलेले दिसते पण काठावरून अलिप्तपणे पाहिले असता बिंब आपल्या जागी स्थिर आहे हे लक्षात येते तसे त्रिगुणांमुळे स्व-रूप अनेकविध रूपात वर्तताना दिसत असले तरी ज्ञानी माणसाला सत् रूप स्थिर असते हे कळलेले असते.

Monday, 23 November 2015

घट फुटे तेव्हा..


घट फुटे तेव्हा । मुक्त घटाकाश
आकाशी आकाश । मिळतसे..!

स्वरूपज्ञान झालेल्या व्यक्तीला मद्‍रूपता(ईशरूपता) प्राप्त झालेली असते. या ऐक्याचे स्वरूप समजावताना दिलेली उपमा-
१)मी जैसा अनंतानंदु । जैसाचि सत्यसिंधु । तैसेचि ते भेदु । उरेचि ना ॥ ५३, जें मी जेवढे जैसे । तेंचि ते जाले तैसे । घटभंगी घटाकाशें । आकाश जेवीं ॥ ५४/१४
मी अमर्याद आनंद, सत्याचा समुद्र आहे तसेच ते (ज्ञानी) आहेत. आमच्यात काही भेद नाही. घट फुटल्यावर घटाकाश जसे महाकाश होते तसे, ज्ञानप्राप्तीमुळे आपला वेगळेपणा जे विसरले ते मी जसा जेवढा तसेच झालेले असतात.
२)घटाचिया खापरिया । घटभंगी फेडिलिया । महदाकाश आपैसया । जालेंचि असे ॥ ३१६/१४

Sunday, 8 November 2015

आरशात बिंब


आरशात बिंब । दिसे, परी नसे
देहामध्ये तसे । आत्मतत्त्व..!

देह आणि आत्मा यांचं अदृश्य नातं परोपरीनं समजावताना दिलेली उपमा-
आरिसा मुख जैसे । बिंबलिया नाम असे । देहीं बसणे तैसे । आत्मतत्त्वा ॥ १०९६/१३
एवंरूप पै आत्मा । देहीं जें म्हणती प्रियोत्तमा । ते मठाकारे व्योमा । नाम जैसें ॥ १११४/१३
आरशात चेहरा आहे असं म्हणता येत नाही. त्याला प्रतिबिंब म्हणतात. देहातील आत्म्याचं असणं आरशातील या प्रतिबिंबासारखं आहे. असा आत्मा देहात आहे असं म्हणणं म्हणजे मठाच्या आकारातील आकाशाला मठाकाश म्हणण्यासारखं आहे.

Monday, 2 November 2015

गळणे फुलणे..


गळणे फुलणे । नित्य चालतसे
वृक्ष साहतसे । जन्मदुःख..!

ज्ञानी माणसातील अहंभाव- ‘मी आहे’ याची जाणीव नाहिशी होते. त्याला असण्याचा, देहाकारात असण्याचा तिटकारा वाटू लागतो. गतजन्मांच्या विदारक स्मृतींनी पुन्हा जन्माला आल्याचे दुःख होते.. हे सांगताना परोपरीच्या, अंगावर येतील अशा उपमा दिलेल्या आहेत.. त्यातली एक सुसह्य उपमा-
डोळा हरळ न विरे । घायी कोत न जिरे । तैसे काळीचे न विसरे । जन्मदुःख ॥ ५३८/१३
डोळ्यात खडा किंवा जखमेत काटा खुपत राहातो तसे ज्ञानी माणसाला जन्मदुःख सलत राहाते..

Saturday, 31 October 2015

नभ मेघांतळी


नभ मेघांतळी । पथ पायांतळी
तरू स्थीर मुळीं । ज्ञानी जसा..!

गुरूकृपेविषयी विस्तारानं सांगून झाल्यावर ज्ञानी माणसाच्या स्थिरतेविषयी, धैर्याविषयी सांगितले आहे. ते सांगताना दिलेल्या उपमा-
जातया अभ्रासवे । जैसे आकाश न धावे । भ्रमणचक्री न भंवे । ध्रुव जैसा ॥ ४८८/१३
पांथिकाचिया येरझारा । सवें पंथु न वचे धनुर्धरा । कां नाही जेवी तरुवरा । येणे जाणे ॥४८९/१३
तैशा आल्या गेल्या ऊर्मी । नव्हे गजबज मनोधर्मी । किंबहुना धिरु क्षमी । कल्पांतीही ॥४९८ /१३
ढगांबरोबर आकाश धावत नाही, ग्रह-तार्‍यांच्या भ्रमणचक्रात ध्रुवतारा फिरत नाही, पथिक जात येत असतात पण पायांखालचा रस्ता स्थिर असतो, बाजूचे वृक्ष स्थिर असतात.. तसा ज्ञानी इंद्रियांच्या ऊर्मींच्या गजबजाटातही स्थिरचित्त असतो.

Friday, 30 October 2015

गाभ्यात पोकळ


गाभ्यात पोकळ । फळून भरते
मग उन्मळते । केळीबाई..!

ज्ञानी माणसाचे मन इतके तरल होते की त्याला आपल्या असण्याचाही संकोच वाटतो. त्याच्यातील ‘अदंभ’भावाविषयी सांगताना दिलेल्या उपमा- शेतकरी जसा पेरलेल्या बीजांवर पांघरूण घालतो तसे तो आपले दानपुण्य इ. सर्व झाकून ठेवतो. दुसरी उपमा-
केळींचे दळवाडें । हळू पोकळ आवडे । परि फळोनिया गाढें । रसाळ जैसे ॥ २१२/१३
केळीचा गाभा हलका आणि पोकळ असतो तरी ती फळते आणि रसाने भरून जाते.. ज्ञानी माणूस ज्ञानरसाने भरलेला असूनही पोकळ, हलका राहातो..

Thursday, 29 October 2015

मुळांना खालती


मुळांना खालती । सापडले पाणी
सांगे आबादानी । वरतून..!

अगा वृक्षासि पाताळी । जळ सापडे मुळीं । ते शाखांचिये बाहाळीं । बाहेर दिसे ॥ १७९/१३ तैसे हृदयीचेनि ज्ञानें । जियें देहीं उमटती चिन्हें । तियें सांगो आतां अवधानें । चांगे आइक ॥ १८३/१३

वृक्षाच्या मुळांना खाली पाणी सापडते ते आपल्याला दिसत नाही पण वरच्या फांद्यांच्या विस्तारावरून ते समजते. तसे ज्ञान ही डोळ्यांना दिसणारी गोष्ट नाही. पण ते प्राप्त झाले असता ज्ञानी माणसाच्या जगण्यात उतरते आणि ते त्याच्या वागण्यातून डोकावत राहते तेव्हा डोळ्यांनाही दिसू लागते. कसे ते पुढे सांगितले आहे. 

Wednesday, 28 October 2015

आभासी नीलिमा


आभासी नीलिमा । दिसे आकाशात
तसे शरीरात । वसे मन..!

क्षेत्राविषयी म्हणजे शरीराविषयी विस्ताराने सांगताना मनाच्या स्वरूपाचे वर्णन आले आहे-
‘जे इंद्रिया आणि बुद्धी । माझारिलिये संधी । रजोगुणाचा खांदी । तरळत असे ॥ नीळिमा अंबरी । का मृगतृष्णालहरी । तैसे वायांचि फरारी । वावो जाहले ॥ १०४, १०५/१३
इंद्रिये आणि बुद्धी यांच्या मध्यसंधीमधे रजोगुणाच्या खांद्यावर मन तरळत असते. आकाशाचा नीलिमा किंवा मृगजळाच्या लाटांप्रमाणे ते आभासी असते.

Tuesday, 27 October 2015

माळी नेतो तसे


माळी नेतो तसे । सुखे जाते पाणी
पेरणी रुजणी । माळी जाणे..!

ईश्वरप्राप्ती कशी करून घ्यावी याचे वेगवेगळे मार्ग समजावताना दिलेली उपमा-
करणें कां न करणें । हें आघवें तोचि जाणे । विश्व चळतसे जेणें । परमात्मेनि ॥ ११८/१२ माळिये जेउतें नेले । तेउते निवांतचि गेले । तया पाणिया ऐसे केलें । होआवें गा ॥ १२०/१२
माळी नेतो तसे विनतक्रार जाते पाणी.. त्याने काही केले असे होते का? तसे आपले जीवित अहंकार विरहित होऊन कर्म करणारे व्हावे. कारण ज्याच्या सत्तेने हे विश्व चालले आहे तो परमात्माच काय करायचं काय नाही हे जाणत असतो...

Monday, 26 October 2015

घरट्यात जीव


घरट्यात जीव । ठेवून पक्षिण
आकाशी भ्रमण । करतसे..!

घाबरलेल्या अर्जुनाला विश्वरूपाचं महत्त्व समजावून सांगताना दिलेली उपमा-
हें रूप जरी घोर । विकृति आणी थोर । तरी कृतनिश्चयाचें घर । हेंचि करी ॥ ६३२/११
का अजातपक्षिया जवळा । जीव बैसवूनि अविसाळा । पक्षिणी अंतराळा- । माजी जाय ॥ ६३४/११
पंख न फुटलेल्या पिलाजवळ जीव ठेवून पक्षिण आकाशात झेपावते तसा तू आपला जीव माझ्या विश्वरूपाजवळ ठेव आणि मग माझ्या मानवी रूपावर प्रेम कर. कारण विश्वरूप हेच माझे खरे रूप आहे.

Saturday, 24 October 2015

विश्वरूप तुझे


विश्वरूप तुझे । आवर आवर
पाहाया अधीर । कृष्णरूप..!

यालागी जी देवा । एथिंचे भय उपजतसे जीवा । म्हणोनि येतुला लळा पाळावा । जे पुरे हे आता ॥ पै चराचर विनोदे पाहिजे । मग तेणे सुखे घरी राहिजे । तैसे चतुर्भुज रूप तुझे । तो विसावा आम्हा ॥ ५९३, ५९४/११
विश्वरूप दर्शनाने भांबावलेला अर्जून कृष्णाला म्हणतो आहे, तुझे विराट रूप पाहून मी भ्यालो आहे.. आता माझं ऐक आणि तुझा हा स्वरूप-विस्तार थांबव. तुझे नेहमीचे साधे रूप हाच आम्हाला विसावा आहे.

Thursday, 22 October 2015

दुःखकालिंदी


दुःखकालिंदीच्या । अतळ डोहात
नित्य बुडतात । कैक गाथा..!

विश्वरूप-दर्शन घडवताना चाललेला स्वरूप विस्तार पाहताना अर्जूनाला काय वाटलं त्याचं वर्णन करताना दिलेली उपमा-
हे बापडी लोकसृष्टी । मोटकीये विपाइली दिठी । आणि दुःखकालिंदीचा तटी । झाड होऊन ठेली ॥ ३४७/११
विश्वरूप-दर्शनाचा सोहळा चाललेला असताना दुःखकालिंदीच्या किनार्‍यावर संपूर्ण लोकसृष्टी झाड होऊन निश्चल उभी राहिलीय.. असं दिसलं.

Wednesday, 21 October 2015

अमृताचा घनु


अमृताचा घनु । प्रत्यक्ष सावळा
पार्थ आसुसला । पावसाळा..!

तो कृपापीयूषसजळु । आणि येरु जवळा आला वर्षाकाळु । नाना कृष्ण कोकिळु । अर्जुन वसंतु ॥११३/११
कृष्ण म्हणजे कृपेच्या अमृताचा मेघ आणि अर्जुन जवळ आलेला वर्षाकाल, तो कोकिळ आणि अर्जुन वसंत.. असं दोघातलं नातं होतं..! त्याचं वर्णन करताना दिलेली उपमा...

Tuesday, 20 October 2015

वर खाली आत


वर खाली आत । सर्वत्र बाहेर
नभ घरदार । मेघांसाठी..!

ईश्वराचे व्यापकत्व विभूतीयोगाने समजावून सांगताना दिलेली उपमा-

जैसे मेघां या तळीं वरी । एक आकाशचि आंत बाहेरी । आणि आकाशींचि जाले अवधारी । असणेंही आकाशी ॥ पाठी लया जे वेळी जाती । ते वेळी आकाशींचि होऊनि ठाती । तेवी आदि स्थिती अंतगती । भूतांसि मी ॥ २१७,२१८/१०

ढगांच्या खाली-वरती, आत-बाहेर आकाश असतं. ते तिथंच उत्पन्न होतात तिथेच राहतात आणि लय पावतात तेव्हा आकाशच होऊन जातात. त्याप्रमाणे सर्व प्राण्यांच्या उत्पत्ती स्थिती लयाला मीच आश्रय आहे.

Monday, 19 October 2015

कमळ फुलता


कमळ फुलता । गंध ओसंडला
लपविता आला । नाही त्याला..!

जैसी कमळकळिका जालेपणे । हृदयीचिया मकरंदाते राखो नेणे । दे राया रंका पारणे । आमोदाचे ॥ तैसेनि मातें विश्वीं कथित । कथितेनि तोषें कथूं विसरत । मग तया विसरामाजीं विरत । आंगे जीवें ॥ १२७, १२८/१०
पूर्ण उमललेले कमळ आपला गंध लपवून ठेवू शकत नाही. राजा रंक सार्‍यांना त्याचा आनंद मिळतो. त्याप्रमाणे माझ्या भक्ताला भक्तीचा आनंद लपवता येत नाही.. माझे वर्णन करण्याच्या आनंदात त्याला सगळ्याचा विसर पडतो...

Saturday, 17 October 2015

गंध जाई दूर


गंध जाई दूर । फूल उरे मागे
देठामधे जागे । आत्मभान..!

परिमळु निघालिया पवनापाठी । मागे वोस फुल राहे देठी । तैसे आयुष्याचिये मुठी । केवळ देह ॥ येर अवष्टंभु जो आघवा । तो आरूढोनि मद्भावा । मजचि आंतु पांडवा । पैठा जाहला ॥  ४१३, ४१४/९
गंध वार्‍यावर दूर निघून गेला तरी देठाची पकड असेपर्यंत फूल देठावर राहाते. तसे आत्मज्ञान झाल्यावर जगण्यासारखे काही उरलेले नसताना भक्ताचे आयुष्य त्याचा देह धरून ठेवते..! एरव्ही त्याचा देहाहंकार ईशरूपात केव्हाच स्थित झालेला असतो.

Friday, 16 October 2015

विस्तार वडाचा


विस्तार वडाचा । वसे बीजामध्ये
आणि वडामध्ये । वसे बीज..!

भक्त आणि ईश्वर यांच्यातलं नातं समजावून सांगताना दिलेली उपमा-

सविस्तर वटत्व जैसे । बीजकणिकेमाजी असे । आणि बीजकणु वसे । वटी जेवी ॥ तेवीं आम्हां तया परस्परें । बाहेरी नामाचींचि अंतरे । वांचूनि आंतुवट वस्तु-विचारें । मी तेचि ते ॥ ४१०, ४११/९
संपूर्ण वटवृक्षाचा विस्तार त्याच्या बीजामध्ये असतो आणि वटवृक्षामध्ये बीज वसलेले असते तसे आम्ही परस्परांमध्ये सामावलेले असतो. बाहेर दिसणारे अंतर केवळ नामाचे असते.

Thursday, 15 October 2015

विश्वपसारा



विश्वपसार्‍याची । जेवढी की व्याप्ती
तेवढी प्रतिती । ईश्वराची..!

 ‘आगा हे जेव्हडी माझी व्याप्ती । तेव्हडीचि तयाचि प्रतिति । ऐसे बहुधाकारी वर्तती । बहुचि होउनि ॥ हे भानुबिंब आवडेतया । सन्मुख जैसे धनंजया । तैसे ते विश्वा या । समोर सदा ॥  २५८,२५९/९

माझी जेवढी व्याप्ती तेवढी ते सर्व मीच ही प्रचिती येते. म्हणून ज्ञानी लोक अनेक होऊन मला एकाला जाणतात. सूर्यबिंब जसे प्रत्येकाच्या समोर असते त्याप्रमाणे ते नेहमी विश्वाच्या समोर असतात.

Wednesday, 14 October 2015

दिव्यावर दिवा


दिव्यावर दिवा ।  दुसरा लावला
कोणता पहिला । कोणा कळे?

१) दीपु ठेविला परिवरीं । कवणातें नियमी ना निवारी । आणि कवण कवणिये व्यापारीं । राहाटे तेंहि नेणे ॥ १२८/९
प्रकृतीचा खेळ चालू असतो. ‘मी’(कृष्ण, ईश्वर) त्या सर्वाचा आधार आहे पण ‘मी’ काही करत नाही. जसा घरात लावलेला दिवा कुणाला काय कर, करू नको ते सांगत नाही. कोण काय करतं आहे हेही तो जाणत नाही. पण तो असतो म्हणून सर्व व्यापार घडतात..
२) जैसा दीपे दीपु लाविजे । तेथ आदिल कोण हे नोळखिजे । तैसा सर्वस्वे जो मज भजे । तो मी होऊनि ठाके ॥ ४२८/९
भक्त माझी भक्ती करता करता मीच होऊन जातो. मग भक्त कोण आणि ईश्वर कोण हे ओळखताच येत नाही. जसा दिव्याने दिवा लावला तर हा पहिला आणि हा दुसरा असा भेद राहात नाही. दोन्ही दिवे सारखेच असतात..
३) कां स्नेहसूत्रवन्ही । मेळू एके स्थानी । धरिजे तो जनीं । दीपु होय ॥ १५४/१३
तूप, वात आणि अग्नी एकत्र येऊन दिवा बनतो तशी अहंकार, बुद्धी, मन, पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये, इच्छा, व्देष, सुख, दुःख, चेतना... इत्यादी छत्तीस तत्त्वे एकत्र येऊन शरीर (ज्ञानेश्वरीत क्षेत्र असं म्हटलं आहे) बनते...

Tuesday, 13 October 2015

पाणी जरी गूढ


पाणी जरी गूढ । सज्ज आहे नाव
‘पल्याड’चे गाव । गाठावया..!

मणसासमोर नेहमी जगण्याचे दोन मार्ग असतात. एका मार्गाने ब्रह्मत्वास जाता येते. दुसर्‍या मार्गाने संसारचक्रात अडकावे लागते... हे मार्ग समजावून सांगताना ही उपमा दिलेली आहे-
‘पाहे पा नाव देखता बरवी । कोणी आड घाली काय अथावी । का सुपंथ जाणोनिया अडवी । रिगवत असे ॥’ २४०/८
समोर चांगली नाव दिसत असता कोणी अथांग पाण्यात उडी घेईल का? किंवा राजमार्ग माहीत असताना कोणी आडवाटेला जाईल का? 

Monday, 12 October 2015

जळी खेळे चंद्र


जळी खेळे चंद्र । असून नभात
तसाच देहात । खेळे भक्त..!

खर्‍या भक्ताचे स्वरूप सांगताना दिलेली उपमा- ‘येरी शरीराचिया सलिलीं । असतेपण हेचि साउली । वाचूनि चंद्रिका ते ठेली । चंद्रीच आहे ॥’ १३८/८ - पाण्यात चंद्र दिसला तरी खरा चंद्र आकाशात असतो त्याप्रमाणे खरा भक्त शरीररूपात दिसत असला तरी तो माझ्याशी एकरूप झालेला असतो.

‘जे जाळ जळी पांगिले । तेथ चंद्रबिंब दिसे आंतुडले । परी थडिये काढूनि झाडिले । तेव्हा बिंब के सांगे ॥’ १३८/९ - पाण्यात जाळं टाकलं तर पाण्यातलं चंद्राचं प्रतिबिंब जाळ्यात अडकल्यासारखं दिसतं. पण काठावर आणून जाळं झटकलं तर चंद्र खाली पडेल का? अडकलेय असं वाटणं हे अज्ञान. ज्ञान झाले की सत्य समजते हे सांगताना ही उपमा दिलेली आहे.