दिव्यावर दिवा
। दुसरा लावला
कोणता पहिला ।
कोणा कळे?
१) दीपु
ठेविला परिवरीं । कवणातें नियमी ना निवारी । आणि कवण कवणिये व्यापारीं । राहाटे तेंहि
नेणे ॥ १२८/९
प्रकृतीचा
खेळ चालू असतो. ‘मी’(कृष्ण, ईश्वर) त्या सर्वाचा आधार आहे पण ‘मी’ काही करत नाही.
जसा घरात लावलेला दिवा कुणाला काय कर, करू नको ते सांगत नाही. कोण काय करतं आहे
हेही तो जाणत नाही. पण तो असतो म्हणून सर्व व्यापार घडतात..
२) जैसा
दीपे दीपु लाविजे । तेथ आदिल कोण हे नोळखिजे । तैसा सर्वस्वे जो मज भजे । तो मी
होऊनि ठाके ॥ ४२८/९
भक्त
माझी भक्ती करता करता मीच होऊन जातो. मग भक्त कोण आणि ईश्वर कोण हे ओळखताच येत
नाही. जसा दिव्याने दिवा लावला तर हा पहिला आणि हा दुसरा असा भेद राहात नाही.
दोन्ही दिवे सारखेच असतात..
३) कां
स्नेहसूत्रवन्ही । मेळू एके स्थानी । धरिजे तो जनीं । दीपु होय ॥ १५४/१३
तूप, वात आणि अग्नी एकत्र येऊन दिवा बनतो तशी अहंकार,
बुद्धी, मन, पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये, इच्छा, व्देष, सुख, दुःख,
चेतना... इत्यादी छत्तीस तत्त्वे एकत्र येऊन शरीर (ज्ञानेश्वरीत क्षेत्र असं
म्हटलं आहे) बनते...
No comments:
Post a Comment